मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या गोंधळाच्या चौकशीसाठी शोध समिती स्थापन करावी. जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर रितसर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठाच्या युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या पेपरमध्येही तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे विद्यार्थांना लॉग इन करता आले नाही. यामुळे परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. शेवटच्या वर्षाच्या परीक्षांवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगला. सध्या विविध विद्यापीठांनी या ऑनलाईन परीक्षेत घोळ घातला आहे.
दरम्यान, ऑनलाईन परीक्षांचा घोळ संपता संपत नसल्याचे पुढे येत आहे. सर्व्हर क्रॅश झाल्याने सोलापूर विद्यापाठीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. आज आणि उद्या (दि.७,८) होणारी परीक्षा ही २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यापीठाद्वारे देण्यात आली आहे.
गोंडवाना विद्यापीठांच्या परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आता १२ ऑक्टोबरपासून परीक्षा होणारयत. सोमवारी परीक्षा सुरु झाल्या. तांत्रिक अडचणींमुळे सकाळी ९ वाजताचा पेपर दुपारी २ वाजता ठेवला. तरीही समस्या संपेना. अखेर पेपरच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे चौकशीची मागणी केली आहे. सध्याच्या वातावरणात परीक्षेला सामोरे जात असताना परीक्षा आयोजनात झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी नैराश्येच्या गर्तेत जाऊन जीवाचे बरे-वाईट करून घेऊ शकतात, अशी सिनेट सदस्यांनी भीती व्यक्त केली आहे.